Monday, December 9, 2013

एक नवीन सुरुवात?



चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेत..भुईसपाट हा शब्दही अपुरा पडेल, अशी काँग्रेसची वाताहत झालीय...ती अपेक्षितही होती..पण उल्लेखनीय म्हणजे आम आदमी पार्टीचा उदय..लोकपाल विधेयकासाठी प्रतिगांधी असं म्हणवून घेणा-या अण्णा हजारेंनी उपोषणांचा सपाटा लावला होता..तेव्हापासून अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण वगैरे मंडळी चर्चेत आली..त्यावेळी त्यांनी इथल्या सगळ्याच राजकीय नेत्यांचा यथेच्छ उद्धार केला..त्यावेळी त्यांच्यावर टीका करणा-यांनी व्यवस्थेत उतरा आणि मग टीका करा, असे सल्ले दिले..आमच्यासारखी स्वतःला पत्रपंडित म्हणवणारी मंडळी त्यात आघाडीवर होती..खरं तर ती एका बदलाची चाहूल होती...उदारीकरणानंतर उदयाला आलेला मध्यमवर्ग, संगणक क्रांती अनुभवणारा तरुणवर्ग सगळेच अण्णांच्या लाटेवर स्वार झाले होते..मै अण्णा हूँ च्या टोप्या सगळीकडे फिरत होत्या..खरं तर त्याची चेष्टा करणा-यांत मी देखील होतो..खरं तर एक चांगली संधी चालून आलेली असताना,अण्णा हजारेंनी राजकारणात प्रवेश करायला नको म्हणून पळ काढला आणि राळेगणसिद्धी गाठली..
अरविंद केजरीवाल यांनी मात्र, राजकारणात प्रवेशाची घोषणा केली..त्यावेळीही यांना कोण विचारणार, किती जागा मिळणार, म्हणून हेटाळणी केली गेली..आम्हीही त्यात होतो..पण दिल्लीनं या हेटाळणीखोरांचे दात घशात घातलेत..आता तटस्थपणे विचार करता, ही एक क्रांती म्हणावी लागेल..कोणत्याही प्रकारची हिंसा न करता, कोणत्याही प्रकारचं जातीय कार्ड न वापरता, कोणत्याही प्रकारची सनसनीखेज वक्तव्ये न करता, फक्त स्वच्छ कारभाराचं आश्वासन देऊन, नवे चेहरे देऊन सत्ता स्थापन करता येते, याचं उदाहरण अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीनं घालून दिलंय..
भाजपच्या विजयाचा एक वेळ काँग्रेसला धक्का बसला नसेल, पण आम आदमी पार्टीचं हे यश काँग्रेसला चांगलंच झोंबलं असेल..पूर्ण विजय मिळाला नाही, पण काँग्रेसला चारीमुंड्या चीत करून आम आदमी पार्टीनं आपली दखल घ्यायला लावली..भारतीयांना एक सशक्त राजकीय पर्याय अशाही प्रकारे उभा राहू शकतो, हे दाखवून दिलंय..आणि तेच काँग्रेससाठी धोकादायक ठरलंय..
भाजपचं बोलायचं झालं तर आम आदमी पार्टीचं यश भाजपच्या चाणक्यांपेक्षा नरेंद्र मोदींना चांगलंच झोंबलं असेल..एकच टेप सगळीकडे वाजवून वाजवून घसेफोड भाषणे करूनही जे शक्य झालं नाही ते शांतपणे, जनतेत जाऊन, लोकांच्या हिताची आश्वासनं देऊन केजरीवालांनी करून दाखवलंय..भाजपला घवघवीत यश मिळालं..पण त्यासाठी मोदींची चर्चा होण्याऐवजी आम आदमी पार्टीचीच चर्चा झाली, हे मोदींसाठी नक्कीच धोक्याचं लक्षण आहे..महत्त्वाचं म्हणजे लोकसभा ज्यांच्या पाठबळावर लढायची, ते मध्यमवर्गीय, संगणकसाक्षर तरुण आम आदमी पार्टीच्या मागे उभं राहिल्याचं चित्र दिसलंय..भाजपसाठी आणि विशेषतः नमोंसाठी ही धोक्याची घंटा आहे..
लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत..आम आदमी पार्टीनं त्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले तर भाजप आणि काँग्रेस दोघांसाठीही धोकादायक ठरू शकेल...महाराष्ट्रात मनसेनं जे केलं, ते इथं हा पक्ष करू शकेल..आधीच आगामी लोकसभा त्रिशंकू असल्याची चर्चा होत असताना, आम आदमी पार्टीचा उदय हा सगळ्याच प्रस्थापितांसाठी एक इशारा ठरू शकतो..
जाता जाता, काँग्रेसनं खूप चांगले निर्णय घेतलेत..पण त्यांची हवी तशी प्रसिद्धी करण्यात ते अजूनही अपयशी ठरलेत..काही निवडक नेते सोडले तर एकही नेता विश्वासपात्र नाही...भाकरी वेळेवर उलटवण्याऐवजी आहे ती करपलेली भाकरी बाजूला ठेवून नव्याने पीठ मळून भाकरी करावी लागेल, नाहीतर सत्तेच्या भुकेने कायमच तडफडत रहावे लागणार आहे..भाजपबद्दल बोलावे असे काहीच नाही..

- नितीन सावंत